Header Ads Widget

*पराशर तलाव* *(एक रहस्यमय भाग)*



 
हिमाचल प्रदेश म्हणजेच ज्याला देवभूमी म्हटलं जातं; ते आठवलं की नेहमीच तीन ठिकाणांची नावं आपण पटकन घेतो... *शिमला, कुलू, मनाली* म्हटलं की आपण देवभूमी बघून आल्याचा भास अनेकांना होतो. 

पण ह्या हिमाचल प्रदेशाला *'देवभूमी'* करणारी अनेक ठिकाणं ह्या प्रदेशात आहेत. काही ज्ञात तर काही अज्ञात. सिमला-मनाली ची केलेली हालत बघून तरी अशी ठिकाणं अज्ञात रहावीत असंच मनापासून वाटते. 

ह्यातील एक अज्ञात पण खूप रहस्यमय असणार एक ठिकाण म्हणजे *'पराशर तलाव'.*

पराशर तलाव हा मंडी ह्या मनालीला जाताना लागणाऱ्या ठिकाणापासून ४९ किमी दूर आहे. समुद्रसपाटीपासून २७३० मीटर उंचीवर असलेला हा तलाव जितका सुंदर आहे त्याहीपेक्षा खूप रहस्यमयी आहे. 

ह्याचं नाव *पराशर ऋषींच्या* नावावरून ठेवण्यात आलं आहे. अस म्हटलं जातं की इथे पराशर ऋषींनी खूप तपश्चर्या केली होती. पराशर ऋषी हे वशिष्ठ ऋषींचे नातू तर वेद-व्यास ऋषींचे वडील होते. 

पराशर ऋषींनी पहिलं पुराण म्हणजेच विष्णू पुराणाची रचना केली होती. जेव्हा पांडव महाभारत संपवून परतत होते तेव्हा देव कमुरनाग ह्यांच्यासाठी चांगली जागा शोधत असताना पराशर तलावाची जागा त्यांना आवडली. देव कमुरनाग ह्यांनी तिकडेच वास्तव्य करण्याचं निश्चित केलं. त्यांच्या सांगण्यावरून पांडवातील भीमाने आपलं कोपर ह्या ठिकाणी जमिनीत खुपसलं. ह्यामुळे इकडे अंडाकृती आकाराचा हा तलाव ज्याला पराशर तलाव अस म्हटलं जातं, त्याची निर्मिती झाली. 

ह्या तलावाचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे ह्या तलावात असणारं *'तरंगत बेट!'* ह्या तलावात गोल आकाराचं एक बेट तरंगत असून ते सतत आपली जागा बदलत असतं. आज ज्या ठिकाणी आपल्याला बेट दिसेल तेच एक आठवडा अथवा महिन्याभराने आल्यावर त्याची जागा पूर्णतः बदलेली असते. 

हे बेट त्या पाण्यात कस तरंगते ह्याबद्दल अजूनही उत्तर विज्ञानाच्या कक्षेत शोधण्यात यश आलेलं नाही. पराशर तलाव पृथ्वीच्या विज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो असं म्हटलं जातं. 

ह्या तलावात जे पाणी आहे ते ७१% टक्के जागा व्यापतं तर त्यात तरंगत असलेलं बेट हे २९% जागा व्यापतं. *पृथ्वी वरील जमीन आणि पाण्याचं तुलनात्मक टक्के प्रमाण इतकंच येतं!* 

ह्या तलावातील जे बेट आहे ते स्वतःभोवती पण फिरते आणि ऋतू नुसार तलावाच्या भोवती पण फिरते. बेटाला पृथ्वी मानलं तर पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरताना तिच्यावरील ऋतू बदलतात एकदम तश्याप्रकारे ह्या बेटाचा ह्या तलावात विहार सुरु असतो. 

अनेक अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मते ह्या बेटाचं ह्या तलावात एका विशिष्ठ पद्धतीनेच भ्रमण होत आहे ज्याच्यावर अजूनही अभ्यास होण्याची गरज आहे. 

असं म्हटलं जातं की जेव्हा हे बेट तलावाच्या अगदी उत्तरेला येऊन टेकते तेव्हा वाईट घटना घडतात. ह्यामागचं खरं-खोटं आपण बाजूला ठेवलं तरी एकूणच ह्या जमिनीचं पाण्यात तरंगणं, तसंच त्याचा त्या तलावामधला विहार ह्या खरोखर विज्ञानाच्या कक्षेतून अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. ज्याची उत्तरं अजूनतरी विज्ञानाला मिळालेली नाहीत.

ह्याहूनही रहस्यमय आहे हा तलाव... *इतक्या उंचीवर एका डोंगराच्या टोकाशी ह्या तलावात पाण्याचा स्त्रोत कुठून आहे हे अजून उमगलेल नाही!* 

उन असो वा थंडी ह्या तलावाच्या पाण्याच्या साठ्यात गेल्या शेकडो वर्षात काहीच फरक पडलेला नाही. ना उन्हाळ्यात हा तलाव आटत ना पावसाळ्यात हा ओथंबून वाहतो. त्याच्या पाण्याच्या पातळीत कोणताच फरक पडत नाही. 

ह्यामुळे ह्या तलावाच्या पाण्याची खोली किती असावी ह्यासाठी अनेक संशोधनं झाली. काही वर्षापूर्वी काही जर्मन संशोधकांनी अत्याधुनिक यंत्र आणि पाणबुड्यांच्या मदतीने ह्या तलावाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ह्या तलावाची खोली सांगता आली नाही. शेवटी त्यांनी ह्या तलावाची खोली मोजण्याचा नाद सोडून दिला. 

ह्या नंतर शासनाने ह्या रहस्यमयी तलावाच्या खोली मोजण्याच्या प्रयत्नांना पूर्ण मनाई केली आहे. त्यामुळे पराशर तलावाची खोली आजही अज्ञात आहे. 

ह्या तलावाचं पूर्ण निळशार असणार पाणी प्रचंड औषधी गुणधर्माने ओतप्रोत केलीस प्रदूषणापासून मुक्त आहे. 

ह्या तलावाच्या आसपास एकही वृक्ष नसून प्रचंड गवत आहे. ह्या गवतातून पाणी वाहत येऊन ह्या तलावात मिसळत असते. ह्या तलावाच्या बाजुचं गवतही औषधी समजलं जातं. अनेक लोक इकडून जाताना प्रसाद म्हणून इथलं थोडं गवत घेऊन जातात. 

ह्या तलावाच्या बाजूला १३ व्या शतकात राजा बाण सेन ह्याने बांधलेलं पराशर ऋषींचं एक सुंदर मंदिर असून हे मंदिर ह्या तलावाच्या बाजूला असणाऱ्या एकमेव झाडाच्या खोडापासून बांधलेलं आहे असं म्हटलं जातं. 

ह्या मंदिराची रचना खूप सुंदर आहे. लोकांपासून लांब आणि अनेक रहस्यमयी आणि अदभूत गोष्टीनी भरलेला हा परिसर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. प्रचंड शांतता आणि आपलं वेगळपण आजवर टिकवून ठेवणारा हा परिसर आयुष्यात एकदा तरी त्याच निस्पृह भावनेने बघावा. 

इकडे आता रस्ते करून आणि हॉटेल काढून ह्या स्वर्गाची वाट लावली नाही म्हणजे कमावलं. नाहीतर शेकडो वर्ष आपलं वेगळेपण जपणारा हा पराशर तलाव उद्या बोटिंग राईड बनवायला आपली सो कॉल्ड पुढारलेली पिढी पुढे मागे बघणार नाहीत...!!👇

Post a Comment

1 Comments

  1. सावकरी कायदा अमलबजावणी ठीक

    ReplyDelete