धुळे- साक्री रोडवरील सिंचन भवन मागे असलेल्या लक्ष्मी नारायण मंदीर, मोबाईल टॉवर लगत असलेल्या पाईप लाईन लीक झाल्यामुळे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी हजारो लिटर पाणी अनेक महिन्यापासून वाया जात आहे. महापालिकेच्या ‘पाणी वाचवा’ या आवाहनाला काळीमा फासणारी ही घटना आहे. काही महिन्यापूर्वी पूर्वी परिसरातील नगरसेविकेच्या सुपुत्राच्या उदात्त हेतूने लक्ष्मीनारायण मंदिराच्या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून येथून नळाचे कनेक्शन जोडले होते. परंतु परिसरातील रात्री-बेरात्री भटकत्या आत्म्यांनी ती नळजोडणीच भंगारासाठी तोडफोड केली. आणि नगरसेविका सुपुत्र आणि भाविक यांचे स्वप्न धुळीला मिळाले. आणि सेवाभावी काम थांबले. परंतु जेथून जोडणी केली तेथे मात्र लिक कायमस्वरुपी असल्याने पाणी येते त्या दिवशी गेल्या 4 महिन्यापासून बेहिशोबी पण हजारो लिटरच्या हिशोबाने पाणी वाया जात आहे. या वाहत्या पाण्यात वाहन चालक आपली लहान वहाने धुवून घेण्यात मश्गुल आहेत. आणि नळ जोडणीसाठी खोदलेला खड्डा त्यातच मोबाईल टॉवर वाल्यांनी प्रयोग करीत खोदून ठेवलेले खड्डे आणि अवजड वाहनांनी उद्धवस्त केलेला रस्ता यामुळे दुचाकी चालक व पायी चालणारे पादचारी जखमी होतांना आपण अशा परिसरात राहतो म्हणून स्वत:लाच शिवी हासडून आपली व्यथा मांडत आहेत. असेल कुणी वाली माईचा लाल, तर त्यांनी त्वरीत उपाय योजना करून परिसरातील नागरिकांच्या वेदनेवर फुंकर घालावी व पुण्य मिळवावे. हे पुण्य आगामी निवडणुकीत कामी येईल.
- गो. पि. लांडगे, ज्येष्ठ पत्रकार, धुळे.
मो. 94227 95910

0 Comments