धुळे- मराठवाडयातील आष्टी , बदनापूर आणि धारूर येथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या आणि पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीच्या अलीकडे तीन घटना घडल्या. त्यात पहिल्या घटनेत पाटोदा येथे आमदारांच्या दौऱ्यात शेकडो कार्यकर्ते हजर असतात. बातमी देताना सर्वांचीच नावे देणे शक्य नसते. मात्र आपले नाव आले नाही की कार्यकर्ते पिसाळतात आणि थेट पत्रकारावर हल्ले करतात. पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे पत्रकार डॉ. हरिदास शेलार यांच्यावर घरात घुसून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याच कारणावरून हल्ला केला. आमदारांचा मतदार संघात दौरा होता. मात्र बातमीत एका कार्यकर्त्यांचे नाव नसल्याने त्याने चिडून पत्रकारावर हल्ला केला. पोलिसात तक्रार दिली आहे. दुसरी घटना जालना जिल्ह्यातील बदनापूरची. जालना जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. वाळू माफियांना अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने वाळू माफियांच्या विरोधात बातमी आली की अधिकारीही चवताळतात. ‘बीडचा लोकप्रश्न’ दैनिकात बातमी आल्याबद्दल एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याने कायदा हातात घेत पत्रकार संदीप पवार यांना मारहाण केली. पोलिसात तक्रार दिली गेली आहे. तिसरी घटना धारुरची, काही वर्षापूर्वी ‘सामना’ वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीचा राग मनात धरून एकाने धारूर येथील वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत देशपांडे यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पत्रकार संरक्षण कायद्याखाली नोंदविल्या जात नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पुन्हा वाढल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेने वरील हल्ल्यांचा आणि धमक्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
*****


0 Comments