धुळे : ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीदेखील अद्यापही धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शिरपूर तालुक्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी; अशी मागणी आमदार काशिराम पावरा यांनी केली आहे.
शिरपूर तालुका 100 टक्के दुष्काळी जाहीर करण्यात यावा; या मागणीसाठी शिरपूर तहसिलदार कार्यालयात आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा विभाग संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासी नायब तहसिलदार गणेश आढारी यांना निवेदन देण्यात आले.
आमदार काशिराम पावरा म्हणाले की, संपूर्ण शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. कोरडवाहू शेती करणारे शेतकरी बांधव पूर्णपणे कोलमडून पडले आहेत. बागायतदार शेतकरी देखील हताश झाले आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा निघून गेला तरी देखील आवश्यक असा पाऊस झालाच नाही. वरूण राजाने शिरपूर तालुक्यातील बळीराजा वर अवकृपा केली आहे. शेतकरी बांधव व तालुक्यातील जनता पावसाअभावी उदास झाली आहे. शेतकरी बांधवांची पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. तसेच पाऊस नसल्याने सर्व व्यवहारांवर, व्यापारी वर्गावर, सर्वसामान्य जनतेवर विपरीत परिणाम झालेला आहे. तालुक्यात पाऊस नसल्याने सर्वच पिके कोमेजून गेली असून पिके हातातून गेली आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला बळीराजा हा पुन्हा मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाने गेल्या काही वर्षांपासून बळीराजावर सातत्याने अवकृपा केली आहे. कधी गारपीट, तर कधी अवकाळी पाऊस तर आता गेल्या दोन महिन्यात पाऊसच नाही. निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले असून शेतकरी राजा हा शेती व पिकांप्रमाणेच पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. शेती करणे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांना परवाडणारी राहिली नाही. कोरोनाच्या संकटात सापडलेली जनता गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीनंतर आता दुष्काळाच्या गर्तेत सापडली आहे. कोरोना व दुष्काळामुळे शेती उद्ध्वस्त झाली व सर्वसामान्यांचे व्यवसाय ठप्प झाले. जनता हवालदील झाली आहे. सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होवून शासनाने शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी व जनतेच्या आर्थिक संकटाची तातडीने दखल घेऊन शिरपूर तालुक्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करावा. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार काशिराम पावरा यांनी केली.
0 Comments