मुंबई--सध्या दहावीच्या परीक्षा सुरु असून औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आणि इतर कर्मचारी हेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विधान परिषदेत बोलताना त्या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये, परीक्षा सुरळीत आणि योग्य पध्दतीने व्हाव्यात यासाठी काळजी घेण्यात आल्यानंतर देखील काल दिनांक १५ मार्च रोजी इयत्ता १० वी च्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण जिल्हा औरंगाबाद येथे कॉपीचा गैरप्रकार समोर आला. येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती गायकवाड यांनी सभागृहात बोलताना दिली.
दरम्यान, सदर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर त्यांनी इथे हे सांगू इच्छिते, की असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, असे गायकवाड म्हणाल्या. तसेच पुढे त्यांनी, "विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे, यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे" असे अवाहन देखील गायकवाड यांनी केलं.
विशेष म्हणजे कॉपी होऊ नये म्हणून कॉपीविरोधी पथकाची सुद्धा नेमणूक करण्यात आली होती. मात्र असं असताना सुद्धा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लक्ष्मीबाई शाळेत कॉपी सुरुच असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अशा शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, सोबतच अशा शाळांना यापुढे परीक्षा केंद्रही दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

0 Comments