धुळे (प्रतिनिधी):
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीवर अनुदान, पिक विमा तसेच पिक कर्जमाफी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “जर शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीतून संरक्षण मिळत नसेल, तर शासनाने रीतसर गांजा व अफू लागवडीसाठी परवाना द्यावा,” अशी उपरोधिक पण तीव्र मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी नेते इश्वर पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र शासनाकडून मदत मिळण्यात विलंब होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यावेळी प्रशासनाने निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, येत्या काळात याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments