अमळनेर- जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पद्ममोहन मंगल कार्यालय येथे धनगर समाजातील सांगोरे व नायदे परिवाराचा मनोमिलन विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत नियंत्रित वातावरणात व शिस्तबद्ध रीतीने सर्व सगेसोयरे यांनी उपस्थिती दिली.
साने गुरुजी विद्यालयाचे उपक्रमशील आदर्श शिक्षक, प्रत्येक पाऊल परिवर्तन व आदर्शाकडे वाटचाल करणारे अमळनेर येथील डी. ए. धनगर यांची मुलगी जिज्ञासा व चोपडा वर्डी येथील योगराज माधवराव नायदे व योगिता बाविस्कर या आदर्श शिक्षक दांपत्यांचा मुलगा प्रफुल्ल यांचा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबांनी प्रचलित चालीरीतींना फाटा देत कालसुसंगत विवाह घडवून आणला. वर्डी ता चोपडा व शिरुड ता अमळनेर येथील नायदे व सांगोरे परीवाराने आहेर पद्धतीला फाटा देऊन अनोखा आदर्श ठेवला. या दोन्ही कुटुंबांनी कोणत्याही प्रकारचा आहेर दिला नाही अथवा स्वतः स्वीकारला नाही. आहेर देणार नाही, आहेर घेणार नाही. असा निश्चय करून धनगर समाजाच्या उन्नतीसाठी निश्चितपणाने ही प्रथा मोडीत काढण्यासाठी या कुटुंबांनी घेतलेला पुढाकार निश्चित प्रेरणादायी आहे. कारण बऱ्याचदा दिलेला आहेर आपण वापरतोच असे नसते. किंबहुना एकीकडचा आलेला आहेर दुसरीकडे चालवला जातो. हा सर्व खो-खो चा खेळ सुरू असतो. आहेर घेण्यासाठी खर्च करावाच लागतो. मात्र एखाद्या कुटुंबाला हा आहेर घेणे परवडत नाही. प्रसंगी तो कर्ज काढून, लोक काय म्हणतील या भीतीने आहेर देत असतो. म्हणून या कुटुंबांनी घेतलेला आहेर प्रथा बंद करण्याचा पुढाकार अभिनंदनास पात्र आहे. कारण या कुटुंबातील सदस्यांनी आहेर प्रथेला फाटा दिला.
तसेच या लग्नसमारंभात एकाच वेळी दोन्ही परिवारांनी कोणत्याही प्रकारची भेटीसाठी यादी ठेवली नाही. अशी कदाचित पहिलीच वेळ असावी. तसेच जेवताना ताटाला पैसे लावले जातात त्याला आपल्या अहिराणी भाषेत ‘अळखण’ असे म्हणतात. नवरदेव, नवरी किंवा जावई, मेहुणे यांच्या ताटाला नारळ अथवा पैसे लावण्याची एक प्रथा आहे. या प्रथेला सुद्धा तिलांजली दिली. करोना प्रतिबंधकतेचे सर्व नियम पाळत लग्नाची पत्रिका न छापता भ्रमणध्वनीवर निमंत्रण दिले.
या दोन्ही सुशिक्षित कुटुंबांनी समाजपरिवर्तनासाठी घरापासून सुरुवात केली आहे. ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे आचरण केले आहे. म्हणून त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिज्ञासा ही बी. टेक. (सिव्हील) असुन व प्रफुल्ल बी.ई. (सिव्हील) झाले आहेत. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी सुख-समृद्धी भरभराट व आरोग्यदायी जाण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर शुभेच्छा देत आहेत. भावी काळात यांच्या हातून सुद्धा असंच समाजाभिमुख कार्य घडो अशा सदिच्छा अमळनेर येथील साने गुरुजी परीवाराने दिल्या आहेत. समाजासह विविध स्तरावरून या आदर्श विवाहाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
*******

0 Comments