शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, अशा उत्सवाची ते
आतुरतेने वाट पाहात असतात.. रक्षाबंधनानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान, शिंदखेडा संचालित आण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुल तर्फे सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून ‘सैनिको हो तुमच्यासाठी..’ अशी भावना व्यक्त करीत आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे दाखवून दिले.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक राख्या स्वतः तयार केल्या आणि सोबतच घराघरातून सुद्धा सैनिकांसाठी राख्या संकलित करून आजच्या समारंभात भारतीय सीमा सुरक्षा बलात कार्यरत असलेले जवान श्री.लोटन सजन खैरनार यांच्याकडे २१६० राख्या सुपूर्द केल्या. तसेच यावेळी विद्यार्थिनींनी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी सैनिक श्री.संजीव नगराळे व श्री.ज्ञानेश्वर गिरासे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अमोल मराठे उपस्थित होते.
या वेळी श्री.अमोल मराठे म्हणाले की, रक्षाबंधन असो की दिवाळी, अशा उत्सवांना सीमेवर देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी परत येऊ शकत नाहीत. त्यामुळे देशवासीयांकडून त्यांना राख्या किंवा आपल्याकडील अनेक गोष्टी मिळाल्या की खूप आनंद होत असतो. आज संगणकीकरणामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी या राख्यांचे महत्त्व मात्र कमी झाले नाही.
माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे म्हणाले की, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण ही केवळ युद्धाच्या वेळी होत असते मात्र, त्यानंतर त्यांचा विसर पडतो. सैनिक आज देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. ते सीमेवर कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात याची अनेकांना कल्पना नाही. सैनिकांना फक्त प्रेम हवे आणि ते मिळाले की त्यांचे आत्मबल वाढत असते. राखी म्हणजे केवळ रेशमी धागा नाही तर त्या धाग्यापासून त्यांना एक वेगळी शक्ती मिळत असते असेही ते म्हणाले. सैनिक श्री.लोटन खैरनार यांनी मनोगतात सांगितले की, आपण दिलेल्या राख्यांनी माझ्या सहकारी सैनिकांना निश्चितच आंनद होईल .
0 Comments